मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; संचारबंदी लागू!

इम्फाळ – मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सशस्त्र टोळ्यांनी लिटान सारेइखोंग गावात घरांना आग लावल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारामुळे ग्रामस्थांना घरदार सोडून शेजारील कांगपोकपी जिल्ह्यातील सुरक्षित भागात आश्रय घ्यावा लागला आहे.

तंगखुल नागा समुदायाच्या एका सदस्यावर ७-८ लोकांनी हल्ला केल्याने वादाला सुरुवात झाली होती. लिटान सारेइखोंगचे प्रमुख आणि पीडित पक्ष यांच्यात हा वाद पारंपरिक पद्धतीने मिटविण्याचे ठरले होते. मात्र, रविवारी नियोजित बैठक होऊ शकली नाही आणि त्याऐवजी सिकिबुंग गावातील काही लोकांनी गावप्रमुखाच्या घरावर हल्ला केला. तंगखुल ही मणिपूरमधील सर्वांत मोठी नागा जमात आहे, तर लिटान सारेइखोंग हे कुकीबहुल गाव आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी जखमींची भेट घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
रविवारी संध्याकाळी तंगखुल नागा आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये दगडफेक झाली आणि त्यानंतर रात्री उशिरा कुकी बंडखोरांनी तंगखुल समुदायाच्या घरांना आग लावली. यातून प्रत्युत्तरादाखल कुकी समुदायाच्या काही घरांचेही नुकसान करण्यात आले होते. यात काही सशस्त्र टोळ्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांतून हवेत गोळीबार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उखरूलमध्ये रविवारपासूनच संचारबंदी लागू केली आहे. तसेच महादेव, लंबुई आणि शांगकाई यांसारख्या संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 10-02-2026