“मी नसतो तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटले असते” : डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump on IND PAK War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादावर खळबळजनक दावा केला आहे. मे २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील तणाव टोकाला गेला असताना, आपण केवळ व्यापारावरील टॅरिफची धमकी देऊन संभाव्य अणुयुद्ध थांबवले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या संघर्षात दोन्ही बाजूंची तब्बल १० विमाने पाडली गेली होती, असा नवा आकडाही त्यांनी आता मांडला आहे.

‘टॅरिफ’मुळे ८ युद्धे थांबवल्याचा दावा

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रंप यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गायले. “मी माझ्या दुसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत आठ युद्धे सोडवली आहेत. त्यापैकी सहा तर केवळ टॅरिफच्या जोरावर मिटवली. मी स्पष्ट सांगितले होते की, जर तुम्ही युद्ध थांबवले नाही, तर मी तुमच्यावर इतका टॅरिफ लादेन की तुम्हाला ते परवडणार नाही. मला निष्पाप लोकांचा बळी गेलेला पाहायचा नव्हता,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

विमानांच्या संख्येत वाढ

भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना ट्रंप यांनी विमानांच्या पडझडीचा आकडा पुन्हा बदलला आहे. सुरुवातीला त्यांनी ५ विमाने पाडल्याचा दावा केला होता, जो नंतर ७ आणि ८ वर पोहोचला. आता हा आकडा त्यांनी १० विमानांवर नेला आहे. “दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडले होते, १० विमानं पाडली गेली होती. जर मी हस्तक्षेप केला नसता, तर हे जगातील भीषण अणुयुद्ध ठरले असते,” असे ट्रम्प म्हणाले.

१ कोटी लोकांचे प्राण वाचवले

ट्रंप यांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतः त्यांचे आभार मानले होते. “पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रंप तुम्ही किमान १ कोटी लोकांचे प्राण वाचवले आहेत,” असा दावाही त्यांनी या मुलाखतीत केला. केवळ भारत-पाकिस्तानच नाही, तर अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील ३२ वर्षांचा जुना वादही आपण अवघ्या दीड दिवसात मिटवल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने फेटाळले दावे

दुसरीकडे, भारताने ट्रंप यांचा हा दावा नेहमीप्रमाणे पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. दोन्ही देशांमधील सैन्य हालचाली आणि युद्धविराम हा द्विपक्षीय पातळीवर डीजीएमओच्या चर्चेतून साध्य झाला होता. काश्मीरसह सर्व मुद्दे हे द्विपक्षीय असून त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याची भारताची भूमिका ठाम आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 11-02-2026