कोकण भाजपचा ‘चाणक्य’ ते मुख्यमंत्र्यांचा फोन; अनिकेत पटवर्धन यांच्या वाढदिवसाने राजकीय वर्तुळात वेधले लक्ष

रत्नागिरी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अनिकेत पटवर्धन यांचा वाढदिवस काल (१२ फेब्रुवारी) संपूर्ण कोकण पट्ट्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र, या वाढदिवसाची खरी चर्चा ठरली ती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिकेत पटवर्धन यांना केलेल्या शुभेच्छांच्या फोनची. मुख्यमंत्र्यांच्या या फोनमुळे भाजप पक्ष संघटनेतील अनिकेत पटवर्धन यांचे वाढते स्थान आणि महत्त्व आता अधिकृतरित्या अधोरेखित झाले आहे.


कोकणातील भाजपच्या विजयाचे पडद्यामागचे सूत्रधार

मूळचे रत्नागिरीचे असलेल्या अनिकेत पटवर्धन यांनी आपल्या ‘चाणक्य’ नीतीने कोकणच्या राजकारणात अल्पावधीतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोकणात पक्ष वाढीसाठी केलेले काम अत्यंत लक्षवेधी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पटवर्धन यांनी आखलेली रणनीती भाजपच्या यशात मैलाचा दगड ठरली. कोकणात अनेक ठिकाणी जिथे भाजपचा चंचुप्रवेश कठीण मानला जात होता, तिथे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पक्षाला विजय मिळवून दिला.


विरोधकांच्या टीकेला निकालांतून उत्तर

अनिकेत पटवर्धन यांचे पक्षात वाढत जाणारे महत्त्व पाहून काही विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पटवर्धन यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि पक्षहितासाठी वरिष्ठांना दिलेले सल्ले किती अचूक होते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. निकालानंतर विरोधकांची तोंडे आपोआप बंद झाली असून, पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.