रत्नागिरी : आचारसंहिता काळात जप्त रक्कम परतीसाठी समितीची स्थापना

रत्नागिरी : आचारसंहिता काळात भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांनी जप्त केलेली रक्कम पडताळणी करून, परत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे आणि जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद्र बिरादार यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रम आदर्श आचार संहिता १५ ऑक्टोबर पासून लागू झाली आहे.

आचार संहिता कालावधीत संयुक्तीक कारणा खेरीज विहीत मर्यादेच्यावर रोख रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने अशी रक्कम भरारी पथक व स्थिर सर्व्हेक्षण पथक यांना आढळून आल्यास ती जप्त करण्यात येते. या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रक्कम बाळगण्याची पडताळणी करण्यासाठी व आवश्यक जप्त केलेली रक्कम परत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सुर्वे व जिल्हा कोषागार अधिकारी श्री बिरादार यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांना आचारसंहिता कालावधीत जप्त केलेली रक्कम परत घेण्यासाठी रक्कम बाळगण्याबाबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवज, पुराव्यासह वरील समितीकडे संपर्क (भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५८८९५०) करावा, असे आवाहन समिती प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 30/Oct/2024