रत्नागिरी: काजू गोदाम उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन; ‘ही’ आहे अंतिम मुदत

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य काजू फळपीक विकास योजनेअंतर्गत कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक तालुक्यांमध्ये काजू गोदाम उभारणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक लाभार्थ्यांना आपले अर्ज सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

योजनेची व्याप्ती आणि आर्थिक तरतूद

काजू फळ विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य शासनाने पाच वर्षांकरिता ६२ कोटी ५० लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची तरतूद केली आहे. या योजनेद्वारे एकूण १ लाख २५ हजार टन क्षमतेची गोदामे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योजनेचे कार्यक्षेत्र:

  • कोकण विभाग: कोकणातील सर्व तालुके.
  • कोल्हापूर जिल्हा: चंदगड, आजरा, भूदरगड, गडहिंग्लज आणि राधानगरी तालुके.

कोणाला घेता येईल लाभ? (पात्र लाभार्थी)

या योजनेअंतर्गत खालील घटकांना गोदाम उभारणीसाठी अर्ज करता येईल:

  • काजू प्रक्रिया सहकारी संस्था.
  • शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) आणि शेतकरी गट.
  • खासगी काजू प्रक्रिया उद्योजक किंवा खासगी उद्योजक.
  • विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (PACS).
  • तालुका खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या.

गोदाम क्षमता आणि अंदाजित खर्च

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने तीन वेगवेगळ्या क्षमतेच्या गोदामांचे प्रारूप तयार केले आहे:

गोदाम क्षमताआवश्यक जागाअंदाजित खर्च
५०० टन२० ते ८० गुंठे७२ लाख ४९ हजार रुपये
१००० टन२० ते ८० गुंठे१ कोटी २० लाख रुपये
५००० टन२० ते ८० गुंठे५ कोटी १० लाख रुपये

टीप: लाभार्थ्याकडे प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के रक्कम स्वनिधी म्हणून उपलब्ध असणे आवश्यक आहे. उर्वरित ८५ टक्के निधी बँक कर्ज किंवा स्वनिधी स्वरूपात उभा करायचा आहे.

अर्ज प्रक्रिया कशी असेल?

१. इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील ‘निविदा/दरपत्रक’ टॅगखाली उपलब्ध असलेले अर्ज डाऊनलोड करावेत. २. सुरुवातीला स्वारस्य निविदांची प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. ३. शासनाच्या मंजुरीनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून सविस्तर प्रकल्प प्रस्ताव (DPR) मागविण्यात येतील.

संपर्क आणि अधिक माहिती

या योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे:

  • पणन मंडळ मुख्यालय (पुणे): (०२०) २४५२८१०० (प्रकल्प विभाग).
  • विभागीय कार्यालय (रत्नागिरी): पवन बेर्डे – ०२३५२-२९९३२८ / ७२१८३५००५४.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 20-02-2026