रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील तिवरी बंदर, वरवडे येथे एका ८५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५) असे या मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत राणे हे त्यांच्या राहत्या घरी एकटेच राहत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. राहत्या घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
जयगड पोलिसांत नोंद
याप्रकरणी अधिक माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, जयगड पोलीस ठाण्यात या घटनेची ‘आकस्मिक मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. वृद्धत्वामुळे किंवा इतर वैयक्तिक कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-04-2026














