भाजपकडून बंडखोरांवर कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती.

राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, काही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत.

यावेळी महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सावंतवाडीतील विशाल परब, श्रीगोंदामधील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधील सुनील बंडगर, अमरावती येथील जगदीश गुप्ता, साकोलीतील सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शोभा बनशेट्टी यांच्यासह एकूण ४० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरांवर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे भाजपच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील बंडखोरावर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 06-11-2024