विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार; ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मराठ्यांनी काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करून घेतले आणि इतर ठिकाणी मराठा विरूध्द मराठा असे चित्र उभे करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये मराठा आमदार कसे निवडून येतील याचीच रचना आखण्यात आली. या खेळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत हे ओबीसींनी पहिले लक्षात घ्यावे. हे लक्षात घेतले नाही, तर आपण हुकणार हे लक्षात घ्या, असे आंबेडकर म्हणाले.

एससी, एसटी, ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा

मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे असा त्यांचा निर्णय झाला आहे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी मत हे एससी, एसटी, ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लीम उमेदवारांनाच दिले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार का?

एक प्रचार निश्चित केला जाणार आहे आणि तो म्हणजे धर्म संकटात आहे. मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजप, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून, आरक्षणाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 07-11-2024