रत्नागिरी : दिवाळीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाकडून केलेल्या धडक मोहिमेत विविध २५ वस्तूंचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दिवाळीच्या फराळासाठी लागणारा रवा, बेसन, मैदा, तेल, मिठाई आदी वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे मिठाई दुकाने तसेच या विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर आगाऊ खाद्यपदार्थ, स्वच्छता याबाबत व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाते; मात्र सण उत्सवकाळात या व्यावसायिकांवर प्रशासनाची करडी नजर ठेवली जाते. दिवाळीपूर्वी या विभागाने प्रशिक्षण आयोजित करून या विक्रेत्यांचे स्वच्छतेबाबत प्रबोधन केले होते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत या विक्रेत्यांकडून खबरदारी बाळगल्याचे दिसून आले. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने दर्जेदार खाद्यपदार्थ तसेच उत्पादने मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देऊन त्यांना आगाऊ प्रशिक्षण दिले जाते. याबाबत या विक्रेत्यांचे प्रबोधन होण्यासाठी जिल्ह्यातील १०० दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण २८६ तर ऑक्टोबर महिन्यात २५ विविध नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. रवा, बेसन-१४ नमुने, तेलाचे-३, गुळाचा-१, दूध १ मिठाईचे २ असे २१ नमुने तपासण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीच्या काळात मिठाईचे चार नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. तपासणीत दोषी आढळल्यास पुढील कार्यवाही करण्यात येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 09/Nov/2024














