एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका, रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न : लक्ष्मण हाके

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासूनच (CM Eknath Shinde) आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. काल रात्री आम्हाला जीवे मारण्यचा प्रयत्न झाला.

मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांच्या शिंगावर घेणार, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, रात्री एकच्या आसपास चार तरुण आले आणि दोन तरुणांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे रात्रीच्या घटनेने सिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जीवा मारायचे आहे. एकनाथ शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना शिंगावर घेणार आहे.

महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? लक्ष्मण हाकेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

लक्ष्मण हाके यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर देखील निशाण साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचे भ्रमण करा. पृथ्वीराज बाबा चव्हाण वर्षानुवर्षे मोठमोठी पदे तुम्ही भोगली आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? ओबीसी भटके कुठे कुठल्या भागात राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? राहुल गांधीला विनंती आहे की असली दरबारी माणसं बाहेर काढा, नाहीतर तुमचा पक्ष संस्थांनांपुरता शिल्लक असेल.

राजाचे काही उत्तरदायित्व नाही का? लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंना सवाल

संभाजीराजे छत्रपतींवर देखील लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, एकदा जनतेला कळू द्या राजा किती लायकीचा आहे. राजा 12 -13 कोटी जनतेचा पाहिजे. वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे. कोण राजा कुठला राजा, आम्ही फक्त त्यांना राजा म्हणायचे त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का? या जनतेसाठी आपण कसे वागलं पाहिजे.

लक्ष्मण हाके म्हणाले, राजेश टोपे सेक्युलरवादी आहेत. शरद पवारांचे चेले आहेत. राजेश टोपे यांना शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील? मला मुंबईत राजेश टोपे भेटले होते ते मला म्हणाले की, सेक्युलर वादी आहे. सर्व आमदार ,खासदार माजी मुख्यमंत्री यांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न आंदोलने दिसतात. बाकी ओबीसी म्हणजे त्यांच्यासाठी शोषित आणि वंचित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 25-09-2024