Maharashtra Weather Update : उत्तरेत थंड वारे, राज्यात पारा घसरला

मुंबई : Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पारा घसरला आहे. पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात पाऱ्यात घसरण झाली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री आणि पहाटे कमालीची थंडी पडत आहे. पुण्यात आज(२० नोव्हेंबर) रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २ ते ३ दिवस शहराच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात विशेषत: किमान तापमानात कमालीचा बदल होतांना दिसत आहे. १३ नोव्हेंबर रोजी १४.६ अंश सेल्सिअसच्या सामान्य पातळीपेक्षा कमी तापमानाचा अनुभव नागरिकांनी घेतल्यानंतर शहराच्या किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली.

३ दिवसात किमान तापमान २०.५ अंशांवर पोहोचले, जे सामान्य तापमानापेक्षा ५.८ अंश सेल्सिअसने जास्त होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

१७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगरमध्ये किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे मागील २४ तासांत ४ अंशांनी घसरले आणि १८ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

त्यात आणखी २ अंशांची घसरण झाली. मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक किमान तापमान १४ अंश सेल्सिअस असताना, यंदा नोव्हेंबरमध्ये शहरात २ अंशांनी कमी तापमानाची नोंद झाली आहे.

शहराच्या इतर भागातही किमान तापमानात लक्षणीय घट झाली. एनडीए, बारामती, हवेलीसह तीन भागात तापमान ११ अंशांपर्यंत घसरले. शिवाजीनगर व्यतिरिक्त इतर चार स्थानकांवरही किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन ते तीन दिवस शहरात तापमानात ही घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

तापमानात झालेली ही घट मुख्यत्वे करुन, उत्तरेकडील थंड वारे शहरात दाखल झाले आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत शहरात पहाटे आणि संध्याकाळी कोरडे हवामान आणि धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तरेत थंड वारे

सध्या उत्तरेकडील भागात थंड वाऱ्यांचा राज्यातील हवामानावर परिणाम होत आहे. सापेक्ष आर्द्रतेत १०-१५ टक्क्यांनी घट झाली असून ढगांचे आच्छादनही कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट होत आहे.

येत्या ३-४ दिवसांपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पूर्वेकडील वारे महाराष्ट्रात अधिक आर्द्रता आणतील, असे हवामान विभागाने सांगितले.

शेतकऱ्यांना सल्ला

* वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.

* रब्बी हंगामात लागवड केलेला भाजीपाला पिकात खूरपणी करून पीक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

* बदललेल्या ऋतूमानानुसार व हवामान बदलानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर पशुपालकांनी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 20-11-2024