मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे.
दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र असून, महाविकास आघाडी चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहेत.
विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण
सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला २९ जागा निवडून येणे आवश्यक असते. महाविकास आघाडीची १२ वाजेपर्यंतची स्थिती अशी आहे की, काँग्रेस केवळ १८ जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गट १७ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १९ जागांवर आघाडीवर आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्याएवढी मते तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभा निकालापेक्षा अतिशय वेगळा निकाल लागताना दिसत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला निकाल येतील, असा मोठा दावा महाविकास आघाडीचे नेते करत होते. परंतु, मोठा उलटफेर होताना दिसत आहे. मतदानाचा वाढलेला टक्का, महिला मतदारांची वाढलेली संख्या, लाडकी बहीण योजना यांसारखे अनेक मुद्दे महायुतीसाठी निर्णायक ठरले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 23-11-2024














