Maharashtra weather update : राज्यातील पावसाचा जोर ओसरला

मुंबई : राज्यात कालपासून (२९ सप्टेंबर) पासून पावसाचा जोर ओसरला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून शनिवारपर्यंत राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मात्र पावसाचा वेग हा कमी असणार आहे.

गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे आज कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बऱ्याच ठिकाणी तर विदर्भामध्ये आज काही ठिकाणी व पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये उद्या ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला मेघ गर्जना व विजांचा कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

बीड, लातूर व धाराशिव येथे उद्या ३० तारखेला व सोलापूर येथे १ ऑक्टोबरला मेघ गर्जना व विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना आज (३० सप्टेंबर) व उद्या (१ ऑक्टोबर) रोजी यलो अलर्ट दिलेला आहे.

राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

पावसाची उघडीप लक्षात घेऊन कापूस, भाजीपाला आणि इतर पिकांवर फवारणी करावी,

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या पशुंना बंधिस्त आणि सुरक्षित जागी बांधून ठेवावे.

सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांची काढणी करावी आणि कोरड्या व सुरक्षित जागी साठवणुक करावी,असा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 30-09-2024