मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.
यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडेंचा दोन तासात राजीनामा घ्या, अशी मागणी केली आहे.
धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या
या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, एखाद्याच्या पापाचा घडा घातला भरला की परमेश्वर सुद्धा दिशा देतो असेच मला वाटत आहे. धनंजय मुंडे यांचा दोन तासात राजीनामा घेणं गरजेचं आहे. तिसरा तासपण लागला नाही पाहिजे. जो व्यक्ती घरगुती हिंसाचार करत असेल, हे मी म्हणत नाही, करुणा शर्मा म्हणत नाहीत, कोर्टानं म्हटलं आहे. आता तरी या सगळ्या गोष्टी कळायला हव्या, तातडीनं राजीनामा घ्यावा, मी आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मेसेज पाठवणार आहे. तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
स्त्री म्हणून करुणा शर्मांचे अभिनंदन
याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट देखील केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, करुणा शर्मा या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या. त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
करुणा शर्मांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोर्टातून मला न्याय मिळाला, न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मुलं सोबत असल्यानं तिघांना प्रत्येकी 5 लाख मिळतील अशी मागणी होती. मला दोन लाख मिळाले आहेत. माझ्या मागणीसाठी मी हायकोर्टात जाणार आहे. महिलांना खूप त्रास आहे. गेली तीन वर्ष पोटगीसाठी मी लढत आहे, किती त्रास झाला हे सांगू शकत नाही, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 06-02-2025














