मुंबई : Ladki Bahin Yojana | ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण सात हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं होतं. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

‘दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.
2100 रुपये कधी मिळणार?
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लांगलं आहे. दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीचा हाप्ता देखील लवकरच जमा होऊ शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 07-02-2025














