निवडणुकीपूर्वी योजनांची घोषणा म्हणजे सरकारने मतदारांना दिलेली लाच, सर्वांवर गुन्हे दाखल करा : राजू शेट्टी

मुंबई : लाडकी बहीण योजना (Ladki Bahini Yojana Maharashtra) आणि इतर योजनांची घोषणा केल्यामुळे राज्याची तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे अनेक योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या आधी अशा घोषणा करून आता बंद करत आहेत.

याचा अर्थ मतदारांना सरकारने लाच दिलेली आहे. त्यामुळे या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

डीबीटी संदर्भातील घोटाळा नव्हे तर हा महाघोटाळा आहे- राजू शेट्टी

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डीबीटी द्वारे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यात बदल करून आता साहित्य खरेदी केला जातंय, हा महाघोटाळा आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले पाहिजे, अशी मागणी ही माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. घोटाळा करण्यासाठीच या योजनेत बदल करण्यात आला असेही ते म्हणाले.

एफआरपीच्या मुद्यावर कोर्ट चालढकल करतंय- राजू शेट्टी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी एका महिन्यात तीन टप्प्यांत पगार घ्यावा, या आशयाचे पत्र राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठवले आहे. पत्र पाठवताच मुंबई हायकोर्टात दोन आठवड्यात तब्बल तीन वेळा सुनावणी घण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. तर एफआरपी टप्प्या टप्यात घेण्याच्या मुद्यावर कोर्ट चालढकल करत असल्याचा आरोप ही राजू शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी संतप्त होत हे पत्र लिहिलं होतं. अशातच आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती ही राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 10-02-2025