Maharashtra Weather News : महाराष्ट्रात विदर्भात आता तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी आता उष्मा (Hot) वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आता बसण्यास सुरुवात झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) सक्रिय झाला आहे. ज्यामुळे उंच पर्वतरांगांमध्ये २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान जोरदार हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मैदानी क्षेत्रांवरही या शीतलरहींचा परिणाम पाहायला मिळत आहे.
रात्री उत्तर पश्चिमेकडून गार वारे वाहत असल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक नोंदवला जात आहे. येत्या चार दिवस हवामान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
राज्यात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही दुपारच्या वेळी उन्हाच्या झळ्या बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदविण्यात आले असून, तापमान ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
उत्तर भारतासह बहुतांश भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा गार वाऱ्याचे सत्र सुरू झाले असून पुन्हा एकदा येथे थंडीचा कडाका वाढला आहे.
हवामानात झालेल्या या बदलामुळे पाऊस (Rain) पुन्हा परतला असून, काही प्रमाणात शेतपिकांचे नुकसान होण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. २२ फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा देशाच्या उत्तरेकडे वातावरण कोरडे होणार असून, तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए १५ पीपीएम ची फवारणी करावी.
* द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 20-02-2025
