औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, दिशाने घेतली आघाडी.. ! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

Netizens bizarre reactions to the political mudslinging in the maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून औरंगजेब हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. औरंगजेबची कबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आहे.

ती कबर काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रामध्ये राजकीय रणकंदन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा राजकारण ढवळून निघालं आहे. औरंगजेबची कबर हटवण्यासाठी राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला असतानाच नागपूरमध्ये हिंसाचारही झाला. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात औरंगजेब मुद्दा तापला असतानाच आता 2020 पासून चर्चेत असलेल्या दिशा सालियान आत्महत्येचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आता त्यांच्या वडिलांनी याचिका दाखल करत या प्रकरणाची नव्याने तपासणी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिशा प्रकरण राज्याच्या केंद्रस्थानी आलं आहे.

यामध्ये राज्याच्या समस्यांवर बोलण्याऐवजी इतिहासातील मुद्दे उकरून काढत ही राजकीय चिखलफेक असल्याची प्रतिक्रियांचा पाऊस नेटकऱ्यांमधून उमटला आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या तसेच दैनिकांच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना राजकारण्यांचे कान टोचले आहेत.यामध्ये अत्यंत उपरोधिकपणे राजकारणांना ‘दिशा’ दाखवणाऱ्या सुद्धा या पोस्ट आहेत. एका पोस्टच्या कमेंटमध्ये म्हणण्यात आलं आहे की औरंगजेब तेराशे मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत. दिशाने आता निर्णायक आघाडी घेतली आहे असे म्हणत एक प्रकारे राज्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय चिखलफेक सुरू आहे त्याला उपरोधिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे आज विधानसभेमध्ये सुद्धा दिशा सालियानचा मुद्दा गाजला. ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे भाजपकडून चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बोलताना परब यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. त्याच्यावर सुद्धा जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून दिशा प्रकरणावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. या सर्व नेत्यांच्या कमेंटवरती नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. यामध्ये काही ट्रॉलिंग करणाऱ्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत, तर काही अत्यंत असभ्य भाषेत आहेत.

दुसरीकडे, छावा चित्रपटापासून ट्रोल होत असलेल्या संतोष जुवेकरला सुद्धा खेचताना त्याच्या जीवात जीव आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जागरुक असलेल्या नेटकऱ्यांनी औरंगजेब, दिशा सालियान मुद्यावरून राजकारण्यांना खडेबोल सुनावले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 20-03-2025