रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राच्या माध्यमातून तीन वर्षात मला योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळाले, असे गौरवोद्गार बी ए योगशास्त्रात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक विजेते विनय साने यांनी काढले.
चार वर्षांपूर्वी रत्नागिरी रत्नागिरीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र सुरू झाले. तेथील बी. ए. योगशास्त्र विषयात श्री. साने यांनी प्रथम प्रयत्नात प्रथम क्रमांक पटकावला. नागपूरमध्ये रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय परिसरातील दीक्षांत समारंभात कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते व भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष व भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे श्री चमूकृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बी ए योगशास्त्राचे पदवी प्रमाणपत्र व सुवर्णपदक विनय साने यांना प्रदान करण्यात आले. त्यांना स्व. श्रीमती सामरबाई करमशी जेठाभाई सोमय्या स्मृती सुवर्णपदक आणि गंगाधर घाटोळे यांनी प्रदान केलेले स्व. श्री नारायण जयराम घाटोळे स्मृती रोख पारितोषिकही मिळाले. विनय साने यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, योगशास्त्राविषयी असलेली माझी श्रद्धा आणि योगवरील माझी निष्ठा यामुळे मला हे यश मिळाले. योगशास्त्र विषय हा आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे याचे अध्ययन करणे गरजेचे आहे. तसेच कालपरत्वे वाढणारी योगशास्त्राची उपयोगिता यावर प्रकाश टाकला.
यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे उपकेंद्राच्या स्थापनेबाबत, तसेच रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे देखील आभार मानले. तसेच विद्यापीठ उपकेंद्र आणि मार्गदर्शक प्राध्यापकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी श्री. साने यांचे अभिनंदन केले. यावेळी विनय साने यांना विषय मार्गदर्शन करणारे प्रा कश्मिरा दळी, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. अक्षय माळी आणि उपकेंद्रातील कर्मचारी तसेच बी ए आणि एम ए योगशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 29-04-2025














