रत्नागिरी : भाजपा बूथप्रमुखांनी पुढील तीन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून या विधानसभा निवडणुकीत काय करायचे आहे, ते ठरवा, असे सांगून भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळ माने यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
तीन निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाही. आता सत्त्वपरीक्षा आहे, असेही ते म्हणाले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या ३५० बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यात २०१९ मध्ये भाजपाला एकही जागा लढायला मिळाली नव्हती. आताच्या निवडणुकीत कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवायची आहे. त्याकरिता बूथ कमिट्या पूर्ण करून कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधावा. वरिष्ठ नेते निर्णय घेतील. परंतु आपण सज्ज राहिले पाहिजे. श्री. माने म्हणाले की, गेले २७ महिने महायुतीचे सरकार आहे, भाजप कार्यकर्त्यांची कामे होत आहेत. राज्य सरकारमध्ये आपला वाटा आहे. सत्तेची सर्व पदे मिळाली असून सासरी सून नांदते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत आपल्याला किती मते मिळाली, याचा अभ्यास करा. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आपण २०१९ प्रमाणेच वागायचे आहे की काय करायचे, हे आपल्या कार्यकर्त्यांना विचारा. ३५२ बूथमधील प्रमुखांनी किमान २० घरांमध्ये भेटा व तीन दिवसांत निर्णय सांगा. कमळाच्या निशाणीवर आमदार झाला पाहिजे, ही समस्त पदाधिकाऱ्यांची भावना आहे. परंतु आज भाजपचा कार्यकर्ता संभ्रमित आहे. भाऊ तोरसेकरांची एक मुलाखत मी ऐकली. त्यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकांचा अभ्यास करता जनता कोणाला निवडून आणण्यासाठी विचार करत नाही तर ती पाडण्यासाठी जास्त विचार करते. त्यामुळे रत्नागिरीकरांनी कोणाला हरवायचे आहे, हे ठरवलेले आहे, असे सूचक विधान बाळ माने यांनी केले. स्वाभिमान जागृत ठेवा. २००४ पासून २०१४ पर्यंतचा इतिहास आठवा. पहिल्या पराभवाच्या वेळेला माझ्या कार्यकर्त्यांच्या घराच्या बाहेर घोषणेबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. आम्ही ती विसरलेलो नाही, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे म्हणाले की, गेल्या वीस वर्षांत विकासकामे न झाल्याने भाजपा कार्यकर्ता दुरावला. आज भाजपला वाचवायचे असेल तर हक्काचा आमदार निवडून दिला पाहिजे. भाजप संपवण्याचा विडा कोणी घेतला आहे का, हे पाहिले पाहिजे. आपण जागृत राहायला पाहिजे. रस्ता झाला पाहिजे, काम झाले पाहिजे, पण हे आम्ही करू शकत नाही. रत्नागिरीत जे काही चालले आहे, त्याला आपण मूकसंमती द्यायची का, आपण जबाबदार ठरणार आहोत. भाजप जिवंत ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक विचार करायला हवा.
सभेला महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, सरचिटणीस सतेज नलावडे, युवा जिल्हाध्यक्ष डॉ. हृषिकेश केळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रूमडे, शहराध्यक्ष राजन फाळके, मंडल अध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, संगमेश्वर मंडल अध्यक्ष विनोद मस्के, महिला शहराध्यक्षा पल्लवी पाटील, मंडल अध्यक्षा सौ. स्नेहा चव्हाण, प्रियल जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 10-10-2024














