रत्नागिरी : निवळी कोकजेवठार येथे दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील निवळी ते कोकजेवठार मार्गावर ग्रीन पार्क ढाब्यासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सुभाष कृष्णा शिंदे (५३, रा. निवळी कोकजेवठार) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालक गजानन बाबल्या रावणंग (रा. निवळी कोकजेवठार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता मयत सुभाष शिंदे हे गजानन रावणंग यांच्या (एमएच ०८/एसी/०५६०) या दुचाकीच्या मागे बसून घरी जात होते. ग्रीन पार्क ढाब्यासमोर आले असता, दुचाकी वेगात असल्याने आणि मागील टायर पंक्चर झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या मध्ये दोघांनाही दुखापत झाली. सुभाष शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १ मे रोजी दुपारी १२.४७ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार १५ एप्रिल रोजी रात्री २२.१३ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 17-05-2025