रत्नागिरी : काँक्रिटच्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम लवकरच

रत्नागिरी : नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी खर्चून शहराच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले; परंतु गेल्या काही दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला तरी साईडपट्ट्या (बाजूपट्ट्या) अजून मारण्यात आलेल्या नाहीत. याबाबत ‘सकाळ’ने वृत्तातून आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन आमदार किरण सामंत यांनी लवकरात लवकर साईडपटट्या भरण्यात येतील, असे सांगितले.

शहरातील मुख्य रस्ते डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही शहरातील काँक्रिटीकरणाचे हे काम अजूनही अपूर्णच आहे. रत्नागिरीच्या प्रवेशद्वारापासून १७ डिसेंबर २०२३ ला काँक्रिटीकरणाला सुरवात झाली. एका बाजूने मारूती मंदिरपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा झाला. त्यानंतर नाचणे येथून येणाऱ्या मुख्य रस्त्याचे सुरू केले गेले तर मारूती मंदिरकडून मजगाव मार्ग चर्मालय नाक्यापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. अजूनही काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे; पण ज्या भागातील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे त्या भागातील बाजूपट्ट्यांचे काम मात्र झालेले नाही. अनेक ठिकाणची बाजूपट्टी काळ्या खडीने भरून त्यावर डांबर टाकण्यात आले आहे; मात्र मारूती मंदिर सर्कल ते बसस्थानकापर्यंत काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या बाजूपट्ट्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत.

नागरिकांतून समाधान
नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी खर्चून शहराच्या मुख्य रस्त्याचे क्रॉंक्रिटीकरणाचे काम झाले आहे. पण पावसाळा अगदीजवळ आला तरी साईडपट्टया अजून मारण्यात आलेल्या नाहीत. पण आमदार किरण सामंत यांनी त्या लवकरच मारल्या जातील असे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 17-05-2025