रत्नागिरी : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत करावीत, असे आदेश जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे आणि पवना धरण पर्यटन सादरीकरणसंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. मंत्री विखे-पाटील म्हणाले, या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
सर्वेक्षणाचे काम गतीने झाल्यास पुढील कामांची निविदाप्रक्रिया राबवणे सुलभ व सोयीस्कर होणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पातील कामांचे सर्वेक्षण गतीने करून ही कामे तीन महिन्यात पूर्ण करावीत. गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून अहवाल सादर करावा. ज्या कामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, याची माहिती ‘मित्रा’ यांच्याकडे देण्यात यावी.
तीन महिन्यांचा कालावधी
जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेल्या या प्रकल्पातील कामांचे गतीने सर्वेक्षण करून यासंबंधीची सर्व कामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण करावीत, असे आदेश जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 22/May/2025













