रत्नागिरी : रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील मिऱ्या काळबादेवी पुलानंतरचा महामार्ग हा उड्डाणपुलाच्या माध्यमातून उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे; मात्र काळबादेवीतील ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उड्डाण पूल न करता जमिनीवरून हा महामार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रेटून धरली आहे. यासाठी संघर्ष समितीही स्थापन केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम तीन जिल्ह्यांत सुरू आहे. या मार्गात अनेक पूल उभारण्यात येत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या-काळबादेवी हा खाडीपूलही मंजूर झाला आहे. कोकणच्या पर्यटन विकासाच्यादृष्टीने हा महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे; मात्र ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे काळबादेवीतील महामार्ग होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यापूर्वी अनेकदा मागणी करूनही उड्डाण पुलाचा प्रस्ताव कायम ठेवल्याने अखेर ग्रामस्थांनी सभा घेऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे. या ग्रामस्थांचा महामार्गाला विरोध नाही; परंतु उड्डाण पूल न उभारता पुलानंतर जमिनीवरून हा महामार्ग न्यावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य ग्रामस्थ करण्यास तयार आहेत. गावातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्ट जमिनीवरून हा महामार्ग बांधावा, अशी आग्रही मागणीही शासनदरबारी करण्यात येत आहे.
म्हणून संघर्ष समिती
उड्डाणपुलामुळे गावातील लोकांना पर्यटनदृष्ट्या काहीही उपयोग होणार नाही. केवळ काळबादेवी गाव हा मिऱ्या आणि काळबादेवी येथील पूल जोडण्यासाठी वापर करणार असाल तर ते चुकीचे आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचे दर्शन घेत प्रवास करता यावा म्हणून समुद्राला समांतर असा हा महामार्ग तयार व्हावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्याने अखेर संघर्ष समिती स्थापन झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 12/Jun/2025














