रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय व स्थानिक संस्थांच्या माध्यमातून २०२४-२५ या वर्षात एकूण ९ लाख २७ हजार ४९९ शेतकऱ्यांना पशुपक्ष्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर वेळोवेळी आजारी जनावरांच्या लहान-मोठ्या अशा १ हजार ३७२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभाग लसीकरण, औषधोपचार आणि कृत्रिम रेतनसारख्या विविध योजनांद्वारे पशुपालकांना मदत झाली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन विभाग, चिपळूण उपआयुक्त स्तरावर पशुआरोग्य व पशुरोग नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा मिळून एकूण १५३ संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत गेल्या वर्षभरात विविध योजनांद्वारे तांत्रिक कामकाज हाताळण्यात आले. पशुधन गणना, पशुवैद्यकीय सेवा आणि योजनांचा प्रचार व प्रसार करणे यांसारख्या कामांद्वारे विभाग पशुपालकांना मदत करतो. ज्यामुळे पशुपालक यांच्या जनावरांची जात सुधारणा आणि उत्पादकता वाढते. यासोबतच, पशुसंवर्धन विभाग लसीकरण आणि कृत्रिम रेतनसारख्या योजनांद्वारे पशुपालकांना मदत करण्यात येते जेणेकरून या विभागामार्फत पशुधनाचे लसीकरण करून रोगांपासून संरक्षण केले जाते तर कृत्रिम रेतनद्वारे जाती सुधारणे आणि उत्पादकता वाढवणे शक्य होते.
जिल्ह्यात या विभागाच्या अहवालानुसार, पशुधन घटकवर्गात गायवर्ग २ लाख ३५ हजार ५०, म्हैसवर्ग-३९ हजार ३७३ इतकी संख्या आहे तर कुक्कुटवर्ग ८ हजार ५८० एवढे पशुधन अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी वेळोवेळी पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यरत असलेल्या विविध ठिकाणाच्या संस्थामार्फत लसीकरण आणि उपचाराद्वारे, शस्त्रक्रियादेखील पशुधनावर केल्या जातात. गेल्या वर्षभरात मार्च २०२५ पर्यंत १ लाख ९० हजार ९२९ पशुधनावर औषधोपचार लाभ देण्यात आला. १९ हजार ५३१ पाळीव जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आले. त्या उपचाराद्वारे ६ हजार ४४८ वासरांचा जन्म झाला. कृत्रिम रेतनापासून गर्भधारणा केलेल्या गायी-म्हैशी संख्या २५ हजार ८४० इतकी आहे तर वंध्यत्व उपचाराद्वारे १० हजार ३७८ गायी-म्हैशींवर उपचार करण्यात आले.
७ हजार ८२८ निकृष्ट वळूचे खच्चीकरण करण्यात आले, तर मोठ्या जनावरांना एकूण ८ लाख ७७ हजार २४९ पशुधनाचे लसीकरण तर ५० हजार २५० कुक्कुट पक्ष्यांचे लसीकरण करण्यात आले.. पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षभरात जिल्ह्यातील १५३ संस्थांद्वारे ३ हजार ४० कार्यमोहिमा राबवण्यात आल्या तर गायी-म्हैशींसाठी १८० वंध्यत्व निवारण शिबिरेही घेण्यात आली. जनावरांवर १ हजार १८३ लहान आणि १८९ मोठ्या शस्त्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोठा आधार देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 12/Jun/2025














