रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये एकमेव भूलतज्ज्ञ

रत्नागिरी : एखादी शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्जन जितका महत्त्वाचा तितकाच भूलतज्ज्ञही. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यांपासून डॉ. विनोद कानगुले हे जनसेवेचा विडा उचलल्याप्रमाणे झटत आहेत. जिल्हा रुग्णालयातील ते एकमेव भूलतज्ज्ञ आहेत.

जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञांच्या रिक्त पदाचा गंभीर प्रश्न होता. त्यामुळे अनेक अत्यावश्यक व नियोजित शस्त्रक्रिया रखडत होत्या. या काळात डॉ. कानगुले यांनी जिल्हा रुग्णालयातील कार्यभार स्वीकारला. केवळ भूल देणे हे आपले काम आहे. इथपर्यंत सेवा सीमित न ठेवता रुग्णाच्या प्रकृतीनुसार जोखमींचे व्यवस्थापन करणे आणि शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीत सहभागी होणे, अशा गोष्टीतही ते सहभागी होत आहेत.

रुग्णांच्या नातेवाइकांशी वैद्यकीय विषयांबरोबरच माणुसकीच्या नात्याने संवाद साधणे डॉ. कानगुले यांचे वैशिष्ट्य आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये असलेली काळजी, भीती दूर करण्यासाठी ते कन्सल्टंट रूममध्ये स्वतः संवाद साधतात. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अत्यावश्यक शस्त्रक्रिया नियोजित वेळेत होत आहेत. डॉ. कानगुले ‘२४ बाय ७ सेवा’ ही संकल्पना कृतीत उतरवत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 21/Jun/2025