रत्नागिरी : रेवस रेड्डी या सागरी महामार्गावरील काळबादेवी येथे उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. उड्डाणपूल बांधण्याऐवजी समुद्र किनाऱ्यावरून रस्ता करा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यामुळे किनाऱ्याचे संरक्षण होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशा मागणीचे ६०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन काळबादेवी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस अधीक्षक यांना दिले.
काळबादेवी संघर्ष समिती अध्यक्ष मधुरा अनेकर, अॅड. अविनाश शेट्ये, सरपंच तुझी पाटील, माजी सरपंच पृथ्वीराज मयेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रिया मयेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग निर्मितीच्या दृष्टीने वेगवान पावले उचलली आहेत. या महामार्गावरील काळबादेवी खाड़ी येथे पूल उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाहून पुढील मार्गावरही उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी ग्रामस्थांबरोबर सकारात्मक बैठक घेण्यात आली होती; परंतु काही कालावधीनंतर याला स्थानिक पातळीवरून विरोध होऊ लागला आहे. उड्डाणपुलापेक्षा किनाऱ्यावरून मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
काळबादेवी खाडी पुलाच्या माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा विरोध नाही; परंतु उड्डाणपुलाऐवजी काळबादेवी समुद्रकिनाऱ्यावर सागरी मार्ग काढण्यात यावा, या मागणीसाठी काल शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनाही निवेदन देण्यात आले. काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी मार्गाचे आम्ही स्वागत करतो, परंतु हा मार्ग करताना काळबादेवी गावाच्या विकासाला अनुसरून आमची मागणी आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. जागतिक वातावरणातील बदलामुळे समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम काळबादेवी समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे.
किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होऊन बंधाऱ्यावरून उधाणाचे पाणी आत येत आहे. पुढील काही वर्षांत ते मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. याचा विचार करता समुद्राला लागून सागरी मार्ग झाल्यास चांगल्या प्रकारचा बंधारा होऊन काळबादेवी गावाचे संरक्षण होईल. तसेच उड्डाणपूल करण्याऐवजी किनाऱ्यालगत जमिनीवरून मार्ग गेल्यास गावातील ग्रामस्थांना चांगले पर्यटनपूरक व्यवसाय उभे करता येतील. काळबादेवी गावाला या सागरी महामार्गाचा फायदा होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकेल, न्याहारी निवास योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळेल, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
… तर पर्यटक परस्पर निघून जातील
काळबादेवीत उड्डाणपूल झाल्यास येणारे पर्यटक हे बाहेरच्या बाहेर निघून जातील आणि त्यामुळे त्याचा गावाला काही फायदा होणार नाही. भविष्याचा विचार करता काळबादेवी गाव प्रथम वाचला तर पर्यटन होऊ शकेल, त्यासाठी समुद्राला लागून समांतर सता रस्ता करावा, असे ग्रामस्थांचे मत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 21/Jun/2025













