राजापूर, दि. २२ जून २०२५ : राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम आता दर्जेदार पद्धतीने होणार आहे. कर्तव्यदक्ष आमदार किरण सामंत यांनी रविवारी किल्ल्याला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि संबंधित अधिकारी व ठेकेदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांच्या या एकाच भेटीने किल्ल्याच्या कामाशी संबंधित सर्व समस्या निकाली निघाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही काळापासून घेरा यशवंतगडच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत स्थानिक शिवप्रेमी आणि ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात होती. कोसळलेल्या तटबंदीच्या कामाचा दर्जा आणि एकंदरीत कामाची गती यामुळे नाराजी होती. आमदार किरण सामंत यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी शिवप्रेमी आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार, किल्ल्याचे काम पूर्णतः दर्जेदार केले जाईल असे आश्वासन दिले. कोसळलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे काम तातडीने आणि योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, उर्वरित कामही उच्च दर्जाचे असावे असे स्पष्ट केले.
आमदार सामंत यांनी यावेळी संबंधित विभागाला स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार विकास गंबरे, स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, पुरातन विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. आमदार सामंत यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे आता घेरा यशवंतगड लवकरच आपल्या मूळ वैभवात परत येईल अशी आशा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 23-06-2025













