खेड : कोकणातील लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या एका शीतपेय कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि.१४) असगणी गावात मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो ग्रामस्थ घोषणा देत रस्त्यावर उतरले आणि या कंपनीविरोधात त्यांनी लोटे औद्योगिक वसाहतून मोर्चा काढला.
हा मोर्चा असगणी ग्रा. पं. कार्यालयापासून सुरू होऊन औद्योगिक क्षेत्रातून फेरफटका मारत पुन्हा ग्रामपंचायतीसमोर येऊन संपला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली असगणी ग्रामस्थानी या मोर्चासाठी मार्गदर्शन केले होते. भूमिपुत्रांना न्याय न दिल्यास आंदोलन उग्र रूप धारण करेल असा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थानी दिला आहे.
आंदोलनात ग्रामस्थांनी प्रकल्पातील नोकरभरती प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जात असल्याची आमची स्पष्ट नाराजी आहे, असे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कोकणातील हा एक मोठा औद्योगिक प्रकल्प असल्याने स्थानिकांमध्ये रोजगाराच्या संधीबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची भावना निर्माण झाली असून, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे : सरपंच
आमच्या गावातील तरुण बेरोजगार आहेत. शीतपेय कंपनीकडून स्थानिकांना कामाची संधी मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी आम्ही ५ जून रोजी मूक मोर्चा काढत भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी केली होती. मात्र, आमची दखल घेतली न गेल्याने आज मोर्चा काढून घोषणा दिल्या आहेत. यापुढे स्थानिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल; अन्यथा ग्रामस्थांच्या भावना उद्रेक होऊ शकतात, असे सरपंच संजना बुरटे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 15/Jul/2025














