संगमेश्वर : शालेय शिक्षण घेताना पुस्तकी शिकवणीतून योग्य धडे दिले जातात; परंतु निसर्गातील शेतीकामाची माहिती केवळ प्रत्यक्ष शेतात जाऊनच मुलांना मिळू शकते. त्याचे प्रात्यक्षिक दाखवले तर ते परिपूर्ण समजू शकते, कामाचा अनुभव येतो आणि श्रमप्रतिष्ठा वाढीस लागते. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा आंबवपोंक्षे या शाळेत भातलावणी प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली.
आंबवपोंक्षे येथील सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्टच्या फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास योजनेमधून भातलावणी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. आंबवपोंक्षे शाळेशेजारील अनिल गुरव यांच्या शेतामध्ये भातलावणी कार्यशाळा घेण्यात आली. गुरव यांनी त्यासाठी शेतजमीन मोकळी करून दिली. प्रात्यक्षिकावेळी प्रकल्प प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी माहिती दिली. भातरोपे कशी काढावीत, काढलेल्या रोपांचे मूठ कसे बांधावेत, चिखलणी करण्यासाठी नांगरणी कशी व किती करावी, प्रत्यक्ष रोपलावणी करताना रोपकाड्या किती घेऊन लावणी करावी, लावणीकामात कंटाळा येऊ नये यासाठी करमणूक गाणं कसे म्हणावे, या गोष्टी शालेय मुलांना त्यांनी समजावून सांगितल्या. ज्या गोष्टी वर्गात शिकवणं शक्य होत नाही त्या गोष्टी काजवे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना पटवून दिल्या तसेच लावणीवेळी गाणीही म्हणून घेतली. विशेष म्हणजे आंबव शाळेतील समृद्धी मायनाक या विद्यार्थिनीने शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून नांगरणीही केली.
व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कदम, सदस्या शुभ्रा हेमन, महादेव गुरव व तसेच ररी ते ७वीतील ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची पाटणकर, स्नेहा पवार, सुवर्णा कुलकर्णी व सविता पोंक्षे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रभात सोनी, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प समितीचे अध्यक्ष रामचंद्र निकम, अरुण सरदेसाई, मधुरा सरदेसाई, रसिका पोंक्षे, विश्वनाथ नामजोशी, आदिती काजवे, नियती काजवे, श्रुती कवळकर हे प्रयोगशाळेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 15/Jul/2025














