स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात रत्नागिरी बसस्थानकाची बाजी!

◼️ मुंबई प्रदेशात रत्नागिरीतील पाली बसस्थानकास ‘ब’, माखजनला ‘क’ मानांकन

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यात सुरू असून, एसटी विभागाचे पथकांनी राज्यातील सर्वच बसस्थानाचे सवेर्र्क्षण पूर्ण केले आहे. पहिल्या सर्वेक्षणात मुंबई प्रदेशातून (कोकण विभाग) रत्नागिरी बसस्थानकाने बाजी मारली असून, 100 पैकी तब्बल 89 गुणप्राप्त करीत अ मानांकन मिळवले आहे. तर पाली बसस्थानकास ब आणि माखजन बसस्थानकास क मानांकन मिळाले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर प्रदेशात लातूरचे औसा बसस्थानक, नागपूर प्रदेशात चंद्रपूरचे बसस्थानक अव्वल ठरले आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आहे का हे पाहण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बसस्थानकावर स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू झाले आहे. दरम्यान मे महिन्यात महामंडळाची एक कमिटीने रत्नागिरी बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रवाशांना सर्व सुविधा आहेत का नाहीह, याची पाहणी केली. दरम्यान, सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नुकतेच जानेवारी ते मार्च 2025 मधील प्रादेशिक विभागनिहाय अ,ब, क वर्गवारीनुसार क्रमांक परिवहन महामंडळाने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई प्रदेशातून रत्नागिरी बसस्थानकाने (नवीन) बाजी मारली आहे. बसस्थानक प्रसाधनगृह 29 मार्क, बसस्थानक व्यवस्थापन 44, हरित बसस्थानकास 16 असे शंभर पैकी 89 गुणासह अ मानांकन प्राप्त झाले तसेच पाली बसस्थानकास ब मानांकन आणि माखजन बसस्थानकास क मानांकन देण्यात आले आहे.

महामंडळाची कमिटी वर्षातून तीन वेळा सर्वेक्षण करणार आहे. पहिला सर्वेक्षण झाला असून गुणांकन जाहीर झाले. येत्या 23 जुलै ते 2 ऑगस्ट असा दुसरा सर्व्हे होईल. तिन्ही सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येईल. या अभियानात 3 कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे. अ मानांकन प्राप्त बसस्थानकास एक कोटीचे बक्षीस मिळणार आहे. शहरी अ वर्ग, निमशहरी ब, ग्रामीण क वर्ग अशा तीन गटामध्ये विभागणी केली आहे. ब वर्गासाठी 50 लाख, तर क वर्गासाठी 25 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

रत्नागिरी शहरात सुसज्ज अशा नवीन बसस्थानकास अ मानांकन मिळाले आहे. याचे श्रेय सर्व लोकप्रतिनिधीसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक व एसटी प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांना जाते. याचे पुढे आणखी दोन फेर्‍या होतील, त्यानंतर अंतिम मानांकन जाहीर होणार आहे. – प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 16-07-2025