मुंबई : विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडील खाते हे मकरंद पाटलांकडे देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं असून ते खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले होते. त्यावरून आपण यूट्यूबची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटेंनी केली. परंतु त्यावरुन विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आणि सरकारवर टीका झाली.
मुख्यमंत्र्यांची नाराजी
माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली. परंतु आपण काहीही चुकीचं केल नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे हे काहीतरी मोठी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार, सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कृषिखात्याची जबाबदारी मकरंद पाटलांकडे?
महायुतीत कृषिखाते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पण माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्याने चुकीची वक्तव्य होत असल्याने त्यावरुन मोठी टीका सहन करावी लागत आहे. त्यामुळेच कोकाटे यांच्याकडील कृषिखाते आता मकरंद पाटलांकडे देण्यासाठी हालचाली सुरू आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली.
मकरंद पाटील हे साताऱ्यातील मंत्री असून त्यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी आहे. मकरंद पाटील यांच्याकडे कृषिखाते देऊन त्यांच्याकडील खाते हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्यातरी माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार नसून त्यात फक्त बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 23-07-2025














