मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गास सावित्रीनदीचे किनाऱ्यालगतच्या गावातून जाणारा पर्यायी घोसाळे ते पंदेरी म्हाप्रळ सुमारे २२ किलोमीटर रस्ता अरुंद आहे. तो रुंद झाल्यास येथील गावविकासास मोठी मदत होणार आहे.
म्हाप्रळ मार्गाने आंबडवे येथे जाण्यासाठी वेळ व अंतर वाचवण्यासाठी हा रस्ता उत्तम असला तरी यंत्रणा व प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. सत्ता बदलली, मंत्री बदलले तरी रस्त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. निवडणुकीपुरती केवळ आश्वासने देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केले जाते. मात्र प्रत्यक्षात हे काम केले जात नाही असा येथील अनुभव आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तर या बाबतीत नेहमीच उदासीन राहिला आहे. तालुक्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून कधी विचार झाला नाही. या रस्त्यावर अनेकवेळा दरडी कोसळतात. एक वाहन समोर आले तर दुसऱ्या वाहनास वळणासाठी जागा राहात नाही.
रस्त्याला साईडपट्टी नाही. पावसाळ्याचे पाणी जाण्यासाठी गटार नाही. अशा दयनीय अवस्थेतील रस्त्याचा तालुक्यातील तीस टक्क्याहून अधिक नागरिकांना दररोज वापर करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे धोकेही वाढले आहेत. बदलत्या काळात वाहनांचे स्वरूप बदलले तसे रस्तेही परिपूर्ण गरजेचे आहे. पण त्याकडे कोणी गांभीयनि लक्ष देत नाही. या रस्त्यावर कामे न करताच बिले काढण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्याने चौकशी नेमली गेली आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्याच्या विविध समस्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व आमदार, खासदार यांच्याकडे २०१६ पासून अनेक वेळा पत्रे व निवेदनाद्वारे मागणी करत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, यासाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधींना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले आहे: परंतु दोन्ही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही-जमीर माखजनकर, सामाजिक कार्यकर्ते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 26/Jul/2025














