साखरपा : जगातली सर्वोच्च पातळीवरील युद्धभूमी, शून्याच्या खाली २५ अंश तापमान आणि समोरून बेछूट येणारे शत्रूचे फायरिंग. अशा अवस्थेतही पुर्येतर्फे देवळे येथील नाईक विजयकुमार लक्ष्मण पवार यांनी युद्ध करत देशरक्षणाची जबाबदारी पूर्ण केली.
नाईक पवार यांना लहानपणापासूनच सैन्याची ओढ होती. शालेय शिक्षण संपवून कुलाबा येथे सैन्यभरती कॅम्पमध्ये ते दाखल झाले. तिथे त्यांची निवड होऊन ते सैन्यातल्या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या महार रेजिमेंटमध्ये १९८४ ला दाखल झाले. या रेजिमेंटचे मुख्यालय असलेल्या मध्यप्रदेशमधल्या सागर इथे त्यांचे सहा महिने प्रशिक्षण झाले.
कारगिल युद्धाच्या आधी एक वर्ष म्हणजे १९९८ ला मणिपूरला असताना त्यांच्या कंपनीची अतिरेक्यांशी झालेली लढाई त्यांना चांगली आठवते. या धुमश्चक्रीत त्यांच्या कंपनीने तीन अतिरेक्यांना ठार केले होते. त्यानंतर श्रीनगरला असताना झालेल्या धुमश्चक्रीतही त्यांनी अतिरेक्यांना आस्मान दाखवले होते. त्या वेळी तर ते निव्वळ दैव बलवत्तर होते म्हणून बचावले होते. अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचे हेल्मेट उडाले; पण त्यात नाईक पवार बचावले.
१९९९ ला त्यांची रेजिमेंट सियाचिन ग्लेशियरला असतानाच कारगिल युद्धाचे ढग जमायला सुरुवात झाली. ग्लेशियर म्हणजे हिमनदी. सियाचिन ग्लेशियर ही जगातली सर्वात उंच अशी युद्धभूमी म्हणून संबोधली जाते. तिथे तापमान हे शून्याच्या खाली पंचवीस अंशावर असते. अशा वातावरणात शत्रूशी सामना होण्याआधी निसर्गाशी सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल वातावरणात कारगिल युद्ध सुरू झाल्याची बातमी नाईक विजयकुमार पवार यांना मिळाली आणि त्यांच्या बटालियनला सियाचिन ग्लेशियर सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सियाचिन ग्लेशियरवर पाकिस्तानी सैन्याचा डोळा आधीपासून असल्यामुळे समोरून पाकिस्तानी सैनिकांचा तोफगोळ्यांचा भडिमार सुरू झाला.
आपला शस्त्रसाठा आणि दारूगोळा पाकिस्तानच्या गोळीबारात स्फोट होऊन नष्ट होण्याचा धोका ओळखून नाईक पवार यांच्या बटालियनने स्थानिक लोकांच्या मदतीने तो योग्यवेळी डोंगराच्या आडोशाला नेऊन ठेवला. पाकिस्तानच्या गोळीबारात सियाचिन ग्लेशियर आणि बेस कॅम्प यांना जोडणारा एकमेव पूल उद्ध्वस्त झाला. त्यामुळे परतीचे सगळे मार्ग बंद झाले होते. साहजिकच मारा नाहीतर मरा, एवढाच पर्याय उरला होता. चार महिने चाललेल्या या युद्धात हवालदार विजयकुमार पवार यांच्या बटालियनचा एकही सैनिक मारला गेला नाही. सहा महिने बर्फात राहून त्यांनी सियाचिन ग्लेशियरचे रक्षण केले.
सैन्यात जायचे हे लहानपणीच ठरवले होते. त्यामुळे कारगिल युद्धाची भीती अजिबात वाटली नाही. या युद्धात लढण्याची संधी मिळाली हाच मोठा सन्मान आहे. सियाचिन ग्लेशियरसारख्या अतिशय कठीण युद्धभूमीवर लढून शत्रूशी सामना केला आणि देश सुरक्षित ठेवला- नाईक विजयकुमार लक्ष्मण पवार
बटालियननेही ती श्रद्धा जोपासली
याबाबत एक दंतकथा नाईक पवार सांगतात. सियाचिन ग्लेशियरच्या बेस कॅम्पजवळ डोग्रा रेजिमेंटच्या एका सैनिकाची चबुतरा बांधलेली समाधी आहे. सियाचिन ग्लेशियरवर ड्युटीसाठी जाताना या समाधीला सलामी देऊन आणि रिपोर्ट करून पुढे जाण्याचा प्रघात आजवर तिथे जाणारा प्रत्येक सैनिक पाळत आला आहे. तसे केल्यास ते सैनिक आपले रक्षण करतात, ही सैनिकांची श्रद्धा आहे. नाईक विजयकुमार पवार यांच्या बटालियननेही ही श्रद्धा जोपासली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 26/Jul/2025














