ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कालपासून राज्यात मंडल यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांत निघणार आहे. खासदार शरद पवार यांनी काल नागपूरात या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात केली.

दरम्यान, आता या यात्रेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या यात्रेवरुन खासदार पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा

“विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या स्कॉलरशिपला राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय, श्रीमंत मराठा हा एनसीपीचा बेस आहे. श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही, हाच या यात्रेमागील राजकीय हेतू आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.ओबीसींच कल्याण हा या यात्रेचे हेतू नाही. तर मागच्या निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला, यात दुमत नाही. मात्र आता ओबीसींच्या लक्षात आले एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.

दरम्यान, शरद पवार यांनी १६० विधानसभेच्या जागां संदर्भात केलेल्या दाव्यावर आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार यांचा 160 जागा संदर्भांतला दावा म्हणजे वराती पाठीमागून घोडं असं आहे. आम्ही यापूर्वी या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टात जाऊ. त्यावेळी कोणीही आमच्या सोबत आलं नाही. कोर्ट एकमेव व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं. त्यावेळी त्यांनी ते केलं नाही. आता बोंबलत बसतात”, असंही आंबेडकर म्हणाले. शरद पवार खोटे बोलत आहेत. त्यांना नाव विचारली तर आठवत नाहीत म्हणतात, म्हणजे किती खोट बोलावं याला एक सीमा असते, अशी टीका आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 11-08-2025