रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील श्रींची ओळख पाच गावांचा एक गणपती अशीच आहे. आज भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत साडेपाच हजार लोकांनी स्पर्शदर्शन घेतले. यामध्ये स्थानिकांसह परजिल्ह्यातील भक्तांचा समावेश होता.
गणपतीपुळेतील पाच गाव, एक गणपती ही परंपरा अनेक दशकांपासून पाळली जात आहे. त्यात मालगुंड महसूल सजाअंतर्गत येणाऱ्या गणपतीपुळे, भंडारवाडा, रहाटाघर आणि नेवरे महसूल मंडळातील भंडारपुळा, काजिरभाटी यांचा समावेश आहे. (ता. २७) पहाटेला पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्पर्शदर्शनाला सुरुवात झाली. पाचही गावांमधील सुमारे १ हजारांहून अधिक कुटुंबांमध्ये पाच गाव, एक गणपती परंपरा पाळली जाते. त्या सर्व ग्रामस्थांनी गणपतीपुळे मंदिरात आज दुपारपर्यंत दर्शन घेतले. प्रथेप्रमाणे स्पर्शदर्शनानंतर श्रींचे पायाजवळचे तीर्थ आणि डोक्यावरचा फुलोरा घरी नेऊन त्यांनी यथोचित पूजनही करण्यात आले. हा दर्शनसोहळा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू होता. तोपर्यंत सुमारे साडेपाच हजार लोकांनी स्पर्शदर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील लोकांचाही समावेश होता.
दरम्यान, येथील गणेशोत्सवाला प्रतिपदेपासून सुरुवात झाली असून, पंचमीपर्यंत साजरा केला जाणार आहे. दरदिवशी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. येथील पूजेची परंपरा प्रभाकर घनवटकर यांच्या घराण्यातून चालू आहे. सध्या अमित घनवटकर हे मंदिरातील पूजेची जबाबदारी पार पाडत आहेत.
फुलोऱ्याचे विहिरीत विसर्जन
गणपतीपुळे परिसरातील पाच गावांमधील ग्रामस्थ श्रींचे दर्शन घेऊन पायाजवळचे तीर्थ आणि डोक्यावरचा फुलोरा घरी नेऊन पूजन करतात. नंतर तो फुलोरा विहिरीत विसर्जित करतात. यामागे त्यांची भावना असते की, पुढील वर्षीपर्यंत गणेशतीर्थ आणि फुलोऱ्याच्या रूपाने विहिरीजवळ म्हणजेच घराजवळ वास्तव्य करतो, असे अमित घनवटकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:02 PM 28-Aug-2025














