रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे वारंवार पुढे येत आहे. तेली आळी नाका व दत्त मंदिर मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी या रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवून दिले. त्यामुळे येथील श्री लाल गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
रत्नागिरी शहरात सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक भयंकर त्रास सहन करत आहेत. पालिकेने पुरेसे डांबरीकरण न करता एका बाजूचा रस्ता कॉंक्रिटीकरण केला आणि अनेक प्रकारचे रस्ते खड्ड्यातच आहेत. काही ठिकाणी डबर टाकून खड्डे बुजवले गेले. पण, हा केवळ तात्पुरता उपाय ठरला. जोरदार पावसाने हा भराव वाहून गेला. रत्नागिरीतील श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध लाल गणपती स्थान आणि तेलीआळी येथील दत्तमंदीर येथील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेऊनभाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी स्वखर्चातून दोन ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याचा पुढाकार घेतला. यामुळे लाल गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित व सोईस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे. पेवर ब्लॉक लोकार्पणावेळी अमित विलणकर, सचिन गांधी, अश्विनी गांधी, संतोष रेडीज, उदय बसणकर, बाळा नाचणकर, सुरेंद्र लांजेकर, किरण कदम, प्रवीण ढेकणे, समीक्षा पाडाळकर, अनिकेत शेट्ये, गोविंद भन्सारी, समीर वस्ता, संकेत भोंगले, बाळा आजगेकर, कमलाकर जोशी, मुकेश माळी, चंपालाल माळी, संदीप रेडीज आदींचा समावेश होता.
तेली आळी नाक्यात खड्डे पडू नयेत, यासाठीच्या उपाययोजना पालिकेला कळवल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून तिथे खड्डे पडले. त्या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू राहिल्याने खड्डा वाढत गेला. त्याठिकाणी दुचाकीचालकांनाही अपघात झाला होता. त्यामुळे अखेर तो खड्डा पेव्हर ब्लॉक टाकून बुजवण्याचा निर्णय घेतला- दादा ढेकणे, शहराध्यक्ष, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 02-Sep-2025














