Mandangad : सेवा पंधरवड्यात नागरिकांनी सहभागी व्हावे – तहसीलदार अक्षय ढाकणे

मंडणगड : छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर 2025 ते महात्मा गांधी यांची जयंती 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये मंडणगड तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध पत्रकाद्वारे तहसिलदार मंडणगड अक्षय ढाकणे यांनी केले आहे.

अभियान तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पहिला टप्यात पाणंद रस्तेविषयक मोहिम ही 17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025 राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायवाट, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पांणंद रस्त्यांचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. या कामकाजाकरीता तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे ग्रामस्तरीय समिती (मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक) स्थापन करणेत आलेली असून 8 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामस्तरावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीत शेतरस्ते मिळण्याबाबत, रस्त्यांबाबत तक्रारी, अतिक्रमण बाबत जास्तीत जास्त अर्ज समितीकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर या समिती रस्त्यांची यादी करुन विशेष ग्रासमसभेमध्ये मान्यता घेण्यात येणार आहे.

महसूल विभाग गाव नकाशावर नोंदी नसलेल्या परंतु वापरात असलेल्या रस्त्यांचे व अतिक्रमित रस्त्यांबाबत रस्ता अदालत घेणार आहेत. सर्व रस्त्यांची गाव नमुना 1 (फ) मध्ये नोंद घेऊन सर्व रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख – गाव नकाशावर नोंद नसलेले व व अतिक्रमित रस्त्यांची मोजणी करणेत येवून रस्त्यांचे सिमांकन व हददीचे सिमा चिन्ह स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभाग शिवार फेरीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील व रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामसभा ठराव करणेत येतील. पोलीस विभाग- आवश्यकतेनुसार अतिक्रमित रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करणेसाठी पोलीस संरक्षण देणार आहेत. दुसरा टप्पा – सर्वांसाठी घरे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025 या कालीवधीत दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.

दापोली उपविभागातील सन 2011 पूर्वीची रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची यादी तयार करण्यात येवून सदरची अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे.

तिसरा टप्पा – नावीन्यपूर्ण उपक्रम 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये मंडणगड तहसील अखत्यारीत शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी आवश्यक असलेले दाखले, अधिवास दाखला, जातीचा दाखला वाटप करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 08/Sep/2025