khair|Tree : खैरतोडीवरील निर्बंध शिथिल; चोरीच्या घटनांमध्ये वाढ

मंडणगड : खैरतोडीवरील निर्बंध उठल्याने त्यांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा दूरच, उलटपक्षी शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय खैरचोरीच्या घटनांमध्ये तालुक्यात वाढ झाल्याचे गेल्या महिन्यात पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या अनेक गुन्ह्यांमुळे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आजही कोठेही खैराची शेती केली जात नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर खैरांच्या नोंदीही आढळून येत नाहीत. जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या वाढलेल्या खैराची विनापरवाना तोड करण्याची परवानगीच बदललेल्या निर्णयामुळे प्राप्त झाली आहे.

चोराला शासन करणे आवश्यक आहे. या कामी पोलिसांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत वाढवून जपलेली झाडे अशाप्रकारे कोणी संधी साधून तोडून चोरून घेऊन जात असेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी; मात्र इथे शेतकऱ्यालाच ऐकून घ्यावे लागते, हा कोणता न्याय ? – महेंद्र सावंत, निवृत्त शिक्षक

वनविभागाचा या प्रक्रियेवरील अंकूशही कमी झालेला दिसत आहे. अनेक प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली तरीही मालकी सिद्ध करून गाडीसह माल काही कालावधीत परत मिळत असल्याने या यंत्रणेचा अंकुशच कमी झाला आहे. खैराची लागवड व तोड या संदर्भात शासनास धोरण निश्चित करावे लागणार आहे कारण, पूर्वीचे सर्व धोरण बदललेल्या निर्णयामुळे धुळीस मिळाले आहे याशिवाय नव्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कार्यपद्धती विकसित करण्याची गरज आहे. काही काळात स्थानिक विरुद्ध बाहेरून आलेले असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सद्यःस्थितीत व्यापारी, कामगार मात्र तेजीत आलेले दिसून येत आहेत. खैरतोडीवरील निबंध शिथिल झाले असले तरी वनविभागाकडून वाहतुकीचे परवाने घेणे क्रमप्राप्त आहे. असे असले तरी चोरीच्या घटनांनी तालुक्यात वाहतुकीच्या परवान्याशिवाय तोडलेल्या खैराची वाहतूक होताना दिसून येत आहे.

खैर चोरून नेण्याने निश्चितच शेतकऱ्यांना हतबल केले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी मुळापर्यंत धडक कारवाई झाली पाहिजे. खैर भरलेल्या गाड्या छुप्या पद्धतीने गावांच्या जोडरस्त्याने जात असल्याने या रस्त्यांचीदेखील वाताहत झाली आहे- विधान पवार, ग्रामस्थ

शासनाने खैरावरील निर्बंध जरी शिथिल केले असले तरी तोडलेल्या खैराची वाहतूक करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. नसेल त्यांच्यावर कारवाई होईल. चोरीच्या घटनांचे दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिस तपास करतील- तौफिक मुल्ला, वनपाल मंडणगड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 10/Sep/2025