दापोली : कोणतेही काम करण्याची प्रबल इच्छा, मेहनत करण्याची तयारी आणि धाडसी पाऊल टाकण्याची तयारी असेल तर अवघड असे काहीच नसते. हे दापोलीतील भावेश कारेकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आयटी क्षेत्रातील करिअर सोडून गावात येऊन बांबू शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. मित्रांच्या सहकार्याने तब्बल ५० एकरांवर ही शेती त्यांनी फुलवली आहे. येत्या काही वर्षांत हा प्रकल्प १,००० एकरांवर नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.
भातेश कारेकर यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील मांदिवली हे आहे. आयटीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात नोकरी करत होते. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी दोन वर्षापूर्वी गावाला येण्याचा निर्णय घेतला, गावाला आल्यानंतर काय करायचे, याचा विचार करत असतानाच बांबू शेतीचा विचार केला. सुरुवातीला दापोलीमध्ये आणि त्यानंतर मंडणगडमध्ये बांबू लागवड करत नव्या वाटचालीला सुरुवात केली. शेती या बांबू क्रांतीत भोर (पुणे) येथील नर्सरी संचालक विनय कोलते यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० एकरात बांबू शेती बहरली आहे.
भावेश कारेकर यांनी सांगितले की, बांबू शेती ही केवळ शेती नसून एक चळवळ आहे. यामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल आणि कोकणाची नैसर्गिक संपत्ती जपली जाईल. बांबू, हा बहुउपयोगी वनस्पती प्रकार असून, त्याचा उपयोग फर्निचर, कागद, बांधकाम साहित्य, हस्तकला तसेच इंधनासाठीही होतो. यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यवसाय उभारणीची संधी उपलब्ध होऊ शकते. भावेश यांचे स्वप्न कोकणात हरित औद्योगिक क्रांती घडवून हजारो लोकांना स्थिर रोजगार उपलब्ध करून देण्याचे आहे.
साऱ्याचा अद्वितीय संगम
दरवर्षी १८ सप्टेंबरला जागतिक बांबू दिवस साजरा केला जातो. २००९ मध्ये थायलंड येथे झालेल्या जागतिक परिषदेत हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. बांबू ही फक्त झाडांची प्रजाती नसून, हरित अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यावरण संरक्षणाचा अद्वितीय संगम आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 18/Sep/2025













