Rajapur : सागरी महामार्गावरील थांब्यावर जब्बार काझी यांनी स्वखर्चाने बसवले बाक

राजापूर : दळे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जब्बार काझी यांनी सागरी महामार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी स्वखर्चाने तब्बल १५ सिमेंटचे बाक बसवले आहेत. त्यामुळे प्रवासी शेडअभावी ताटकळत उभे राहावे लागणाऱ्या दळे, कुवेशी, वाघ्रण आदी भागांतील प्रवाशांसह शाळकरी मुलांना दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गाने वाहनांची वर्दळ गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. त्यामध्ये स्थानिक प्रवाशांसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जा-ये करणाऱ्या प्रवाशांसह वाहनांचा समावेश आहे; मात्र, सागरी महामार्गावर अनेक ठिकाणी एसटी गाड्यांना थांबे असले, तरी त्या ठिकाणी प्रवासीशेड बांधलेल्या नाहीत. त्याचवेळी प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्थाही उभारलेली नाही. प्रवाशांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन ती दूर करण्याचा निर्धार दळे येथील काझी यांनी केला. त्यांनी स्वखचनि सागरी महामार्गावरील जैतापूर प्राथमिक आरोग्यकेंद्र, होळी स्टॉप, दळेस्टॉप, कुवेशी स्टॉप, वाघ्रण स्टॉप तसेच तुळसुंदे येथील स्मशानभूमी परिसरात तब्बल १५ सिमेंटचे बाक बसवून प्रवाशांना दिलासा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 11/Oct/2025