Chiplun : चिपळुणात उड्डाणपुलावर बसवले ४०० गर्डर

चिपळूण : चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक वळवून ४० टनी गर्डर उड्डाणपुलावर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ४०० गर्डर चढविण्यात आले आहेत.

चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी १ हजार ८४० आणि रुंदी ४५ मीटर आहे. अनेक ठिकाणी नवीन पिलर (पिलर कॅप) उभारण्यात आले आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन सरकारकडून देण्यात आली आहे. सध्या पाऊस थांबल्याने कामाला वेग आला आहे. शहरातून जाणारा उड्डाणपूल हा गेल्या दोन वर्षापासूनच चर्चेत आहे. दोन वर्षापूर्वी बहादूरशेख येथे गार्डर कोसळल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जा विषयी शंका निर्माण झाली होती. त्यानंतर नवीन डिझाईन मंजूर करण्यात आले. पूर्वी दोन पिलर मध्ये ४० मीटरचे अंतर होते. नव्या डिझाईननुसार प्रत्येकी २० मीटर अंतरावर पिलर उभारण्यात आले आहेत. पाऊस थांबल्यामुळे उड्डाणपुलावर गर्डर चढवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत ४०० गर्डर चढवून झाले आहेत. तर अजून तेवढेच गर्डर चढवण्याचे काम प्रलंबित आहे. यासाठी १५०० टनी व १००० टनी अशा दोन क्रेन मागवण्यात आल्या आहेत.

गर्डर बसविण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. गर्डर चढवताना अपघात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी सर्व प्रकारची काळजी घेऊन हे काम करत आहे. प्रामुख्याने दिवसा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहतूक असते अशावेळी गर्डर चढवण्याच्या कामात व्यत्यय येतो त्यामुळे गर्डर चढविण्याचे काम रात्री आठ नंतर हाती घेतले जाते. रात्री महामार्गावर वाहतूक कमी असते तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद केली जाते तर कधी शहरातील अन्य मार्गावर वळवली जाते. यासाठी महामार्ग पोलीस, वाहतूक पोलिस आणि एजन्सीचे कर्मचारी तैनात केले जातात.

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला तडे
मुंबई-गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन वेळोवेळी देण्यात येते. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल असे अंदाज सांगण्यात आले आहेत. पूर्ण झालेल्या महामार्गावरील खड्डे दररोज वाढत आहेत. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला तडे गेले आहेत. शहरातील महामार्गावर अपघाताचे ब्लॅक स्पॉट बनले आहेत. महामार्गावरील खड्क्यांची वाढती संख्या ही दुचाकी अपघातांसाठी आमंत्रण ठरली आहे.

उड्डाणपुलाचे काम ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विनाअपघात आणि वाहतुकीला अडथळा न करता काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शाम कुणेकर, सहाय्यक अभियंता

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:35 PM 21-Oct-25