पावस : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावस परिसरामध्ये या पावसाने धुमाकूळ घातला. वादळी पावसामुळे अंतिम टप्प्यातील भातशेती धोक्यात आली आहे. आत्तापर्यंत ८० टक्के भातकापणी पूर्णत्वास गेली असून, २० टक्के कापणी पावसामुळे आडवी झाली असून, अनेक ठिकाणी पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी नाचणी कापणीस तयार होत असताना ती आडवी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
यावर्षी २० मे रोजी पावसाने सुरुवात केल्यामुळे आतापर्यंत जवळजवळ सहा महिने पावसाने आपले सातत्य ठेवले आहे. आत्तापर्यंत परिसरामध्ये ८० टक्के भातकापणी घाईगडबडीने पूर्णत्वास गेली आहे; परंतु उर्वरित २० टक्के भातकापणी लवकरात लवकर आटोपण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत; परंतु पावसामुळे भातशेती आणि नाचणीचे पीकही आडवे झाले आहे. उन्हात वाळत घातलेल्या भातखाचरात पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होत आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे भातशेतीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. या संदर्भात शेतकरी दशरथ रांगणकर म्हणाले, यावर्षी भातशेती चांगल्या स्थितीमध्ये होती; परंतु विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाल्यामुळे पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याशिवाय जमिनीवर पडलेले भात उचलता येणार नाही. ते पुन्हा रुजून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 29-10-2025










