रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. भटके कुत्रे झुंडीने फिरत असल्यामुळे अचानक चिमुकले, महिला, ज्येष्ठांवर हल्ला करून चावा घेत आहेत. त्यामुळे मोकाट, भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत २ हजार ५०० हून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. भटक्या, मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्यात नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत प्रशासन सपशेल फेल ठरली आहे.
सध्या राज्यभरात मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत पसरवली आहे. झुंडीने फिरणारी कुत्रे शालेय, महाविद्यालयीन मुला, मुलींवर हल्ला चढवून जखमी करत आहेत. कित्येक व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत आहेत. रत्नगिरी शहर जिल्ह्यातही मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रत्नागिरी शहरासह अन्य तालुक्यात गावा-गावात मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर असतो. तसेच विविध मासांहरी हॉटेल, चिकन, मटण, मच्छी मार्केट या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मासांहारीची घाण रस्त्यावरच फेकत असल्यामुळे कुत्रे खाण्यासाठी गर्दी करतात तसेच चायनीज, हॉटेलच्या बाहेरही मांसाहर, अन्नपदार्थ खाण्यासाठी कुत्र्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना बाजारपेठेत, घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
रत्नागिरी शहरात माळ नाका, मारूती मंदिर, जे. के. फाईल्स, कोकणनगर, साळवी स्टॉप, जयस्तंभ, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, कारवांची वाडी, लक्ष्मी चौक तसेच तालुक्यात. विशेषता रत्नागिरी तालुका, लांजा, दापोली, गुहागर, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर, खेड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात ५३७ तर दापोलीत ४७९ यासह अन्य ठिकाणी सर्वाधिक श्वानदंश झाल्या आहेत.
ही कुत्री झुंडीने फिरून नागरिकांवर हल्ला करत आहेत. रात्री अपरात्री रस्त्यावर एकट्याने फिरणे धोकादायक ठरत आहेत. रत्नागिरी शहरात सध्या मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्ऱ्यांची दहशत वाढली आहे. अशा कुत्र्यांवर बंदोबस्त करावा, जास्तीत जास्त निर्बिजीकरण करावे, अशी मागणी रत्नागिरीकर करीत आहेत.
निर्बिजीकरण, मोकाट कुत्र्यांवर प्रतिबंध हवाच
रत्नागिरी जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी, खेड आणि चिपळूण या शहरांमध्ये कुत्र्यांच्या निर्बिजीरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. लाखो रूपये खर्च करण्यात आले. कुत्र्यांची संख्या अधिक निर्बिजीकरणाचे प्रमाण कमी झाले आहे. मोकाट कुत्रे पकडण्याचे प्रमाण ही कमी झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट, कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सर्वाधिक श्वानदंश रत्नागिरी, दापोली, संगमेश्वर, लांज्यात
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस मोकाट, भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून लहानमुले, ज्येष्ठांचा चावा घेत आहेत. आतापर्यंत रत्नागिरी ५३७, दापोली ४७९, संगमेश्वर ३०२ आणि लांजा तालुक्यात २५९ अशा सर्वाधिक श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कुत्र्यांची निर्बिजीकरण वाढवावे अशीच मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 03/Nov/2025














