Municipal Corporation Election 2025: राज्यातील महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत काय घडलं?

नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगानं बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे. (Municipal Corporation Election 2025)

राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार-

आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. तसेच दोन्ही पक्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा अन् शिंदे गटात वाद

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला पोहोचला आहे. प्रचारसभादरम्यान, दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी प्रचारात एकमेकांचे हवे तेवढे लचके तोडल्याचे पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांचीही झाली बैठक-

8 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे यासंदर्भात चर्चा झाली. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या संदर्भात काय रणनीती असावी याची चर्चा झाली. येणाऱ्या काळात पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होणयाची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायालयाने दिलेल्य आरक्षणाच्या निर्णयामुळे पुढे जाऊ शकतात. पलिका निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने पुढे जायला हवं, याबाबत दोघांनी काही पद्धती डेव्हलप करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका आणि इतर महत्वाच्या पालिका यात युती व्हायलाच पाहिजे, यावर युतीतील नेत्यांचे एकमत झाले. पुन्हा एक बैठक व्हायला हवी असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानुसार काल मी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलो होतो, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:34 AM 12/Dec/2025