Maharashtra Weather : कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवली शक्यता

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात तापमानाचा पारा खाली गेला आहे. राज्यातील अनेक शहरांत तापमान 10 अंशावर गेलं आहे. अशात आता या कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या आठवड्यात थंडीचा जोर काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

दिवसात तापमान उष्ण राहील, तर रात्री आणि पहाटे थंडी कायम राहील. पुढील 24 तासांत राज्यातील बहुतांश भागात तापमान किमान 10 ते 16 अंश सेल्सिअस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर कमाल तापमान 22 ते 26 पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागात कसं असेल हवामान?

मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दिवसाचं तापमान जास्त असेल. त्या तुलनेने सकाळी थंडी कायम राहील. उंच भागात धुकं पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कोरड्या हवामानासह आकाश निरभ्र राहील. राज्यातील सर्वाधिक थंड भाग हा विदर्भात राहण्याची शक्यता आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये तुलनेने किमान तापमानात मोठी घट होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. थंडीच्या लाटेचं प्रमाण कमी होणार असून गारवा कायम राहील असं अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी सकाळी मुंबईत गारठा जाणवला. रात्रीचा तापमानाचा पारा 17.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. तर दिवस कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा, तर दिवसा काही प्रमाणात उष्णता जाणवेल. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात AQI मध्ये सुधारणा झाली आहे.

हवामानशास्त्रीय अंदाजानुसार, देशभरात हिमालयीन राज्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या बर्फवृष्टीची शक्यता आहे. तर दुसरीकडे केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 15/Dec/2025