Aaditya Thackeray | मुंबई मराठी माणसाचीच, मशाल हाती घेऊन महापालिका जिंकूया : आदित्य ठाकरे

मुंबईः महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाने प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही. मुंबई मराठी माणसाचीच. मशाल हाती घेऊन महापालिका जिंकूया, असे आवाहन शिवसैनिकांना केले.

शिवसेना ठाकरे गटाकडून वरळीतील एनएससीआय डोम शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या मेळाव्याची सुरुवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शनाने न करता आदित्य ठाकरे यांनी सादरीकरणासह शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प, ईव्ही धोरण, मुंबईतील रस्त्यांचे जाळे तसेच कोस्टल रोड यासह विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.

यावेळी कोस्टल रोड प्रकल्पाला २०१४ पासून २०१६ पर्यंत केंद्रातील मोदी सरकारने परवानगी न दिल्याने अडथळा निर्माण झाला. मात्र अथक प्रयत्नांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता पूर्णत्वास गेला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या रस्त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले, या सर्वांमध्ये आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबईतील एकही रस्ता अद्याप पूर्णत्वास जात नाही. मुंबईती रस्ते खड्डे मुक्त झाले नसून यांचे खिशातले खड्डे बुजवले गेले अशी टीका त्यांनी केली. यावेळी धारावीकरांच्या पुनर्विकासांवर त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. हा पुनर्विकास प्रकल्प अदानीला दिल्यावरून त्यांनी टीका केली. धारावीसह मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही अशी घोषणा करताना त्यांनी मुंबई कोणाची असा सवाल करताना मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार, मुंबईसाठी आम्ही प्रसंगी प्राणही द्यायला तयार आहोत, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 17/Dec/2025