राजापूरात कुणबी बांधवांनी एकोपा राखावा : रवींद्र नागरेकर

राजापूर : कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र नागरेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. या सभेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करताना विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी समाजोत्रती संघाने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे संघाच्या पदाधिकारी वा कार्यकर्त्यांनी समाजबांधवांनी आपापल्या राजकीय पक्षांचे काम करावे; मात्र संघटनेमध्ये निवडणुकीदरम्यान कोणतेही राजकीय वादविवाद न करता कायम एकोपा वा सलोखा राखण्याचे आवाहन केले.

शहरातील राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या सभेला प्रकाश कातकर, दीपक बेंद्रे, सुभाष नवाळे, रमेश पाजवे, सुरेश बाईत, सुरेंद्र तांबे, तुकाराम कुडकर, संतोष हातणकर, गोपाळ गोंडाळ, देवीदास राघव, पांडुरंग लिगम, मोहन पाडावे, भास्कर कुवळेकर, कशेळकर, संजय नाटेकर, शांताराम तळवडेकर, संदीप तेरवणकर आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला कुणबी संघाकडून पाठिंबा दिला आहे त्या संबंधी चर्चा करण्यात आली. संघाच्या शाखेतील व ग्रामीण समितीमधील कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करत आहेत. त्यांनी तसेच काम करत राहावे, असेही बैठकीत ठरवण्यात आले.

आपापल्या राजकीय पक्षाचा प्रचार करावा
दीपक नागले हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून, ते कुणबी संघाच्या राजापूर शाखेच्या ग्रामीण शाखेचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये गावोगावी प्रचार करताना कुणबी संघसुद्धा या राजकीय पक्षाबरोबर असल्याचा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तिलोरी कुणबी म्हणून समाजाच्या यादीमध्ये समावेश झाल्याबाबत राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे समाजाच्या संभ्रमावस्थेमध्ये अधिक भर पडली होती, याबाबतही सभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामध्ये समाजबांधवांनी आपापल्या राजकीय पक्षाचा प्रचार करावा; मात्र त्यामुळे कुणबी समाजामध्ये दरी निर्माण न होता सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 26/Oct/2024