मुंबई : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट आहे.
विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारठा असून, उत्तरेकडील गार वाऱ्यामुळे ख्रिसमसचे स्वागतही थंडीने होणार आहे.
त्यानंतर मात्र किमान तापमानात हलकी वाढ नोंदविण्यात येईल. परिणामी नव्या वर्षाच्या स्वागताला मात्र पारा चढणार असल्याचे चित्र आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान कमालीचे खाली घसरले आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासोबत विदर्भात थंडीचा मुक्काम आहे. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात गारवा असून, शहरात मात्र तुलनेने गारवा कमी आहे.
काश्मीरात पहिल्याच दिवशी १ फूट बर्फवृष्टी
◼️ जम्मू काश्मीरमध्ये ४० दिवसांच्या ‘चिल्ला-ए-कलां’स रविवारी प्रारंभ झाला.
◼️ बर्फवृष्टीच्या या हंगामाच्या पहिल्याच दिवशी गुलमर्ग-सोनमर्गमध्ये १ फूट बर्फवृष्टी झाली.
◼️ दोन दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
◼️ उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही काही भागात बर्फवृष्टी झाली.
◼️ बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून १५ उड्डाणे सोमवारी रद्द करण्यात आली.
◼️ काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे थंड हवा पठारी प्रदेशात पोहोचली असून दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये गारठा वाढला आहे.
किती किमान तापमान?
जेऊर – ८
नाशिक – ८.८
मालेगाव – ८.४
नागपूर – ९.२
छ. संभाजीनगर – १०.५
परभणी – १०.६
नांदेड – १०.८
सातारा – ११.२
उदगीर – १२
महाबळेश्वर -१२.१
सांगली – १३
सोलापूर – १४.१
मुंबई – १५.२
कोल्हापूर – १५.३
माथेरान – १७.४
नाताळपर्यंत किमान तापमानाची घसरण कायम राहील. त्यानंतर किमान तापमानात हलकी वाढ होईल, पण गारवा टिकून राहील. वर्षअखेरीस थंडी कमी राहील. – अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 23-12-2025













