मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, जनतेला थेट लाभ मिळेल अशा कुठल्याही घोषणा करण्यावर किंवा निर्णय घेण्यावर निर्बंध आले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. आजच्या कॅबिनेट बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, 1 एकर जमीन देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1. ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)
2. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
3. धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)
4. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)
दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
राजधानी दिल्लीतही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोच्या 12 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात 13 नवीन स्टेशन असणार आहेत. ज्यामध्ये, 10 अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आणि 3 उड्डाण स्टेशन असणार आहेत. राजधानी दिल्लीतील हा 16 किलोमीटरचा प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्ण होईल. या निर्णयामुळे दिल्लीतील मेट्रोचं जाळ आता 400 किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहे. देशातील सर्वात विस्तीर्ण असं हे मेट्रोचं जाळ असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 25-12-2025













